आजपासून भारतात ५जी इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीनं सुरु होणार आहे. देशात ५जी सेवा सुरु होत असून पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात ५ जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. ५जी सेवा लोकांपर्यंत लवकर कशी पोहचेल, कश्या पद्धतीने चांगली सेवा देता येईल यासाठी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी पहिलं ५जी इंटरनेटची सुरुवात करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५जी चे फायदे आणि ५जी सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला ५जी नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे. भारतात ५जी ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाहीय. ही सेवा म्हणजे, १३० कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आहेत. ५जी सह भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेनं एक मजबूत पाऊल उचलेल. भारतानं थोडी उशीरा सुरुवात केली असेल. परंतु, आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी ५जी सेवा आणणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं. ते ५जी सेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, २०१४ मध्ये भारतात २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या ८५ कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या ५जी सेवेचा मोठा फायदा होईल. मोदी म्हणाले, आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून भारतानं आज नवा इतिहास रचला आहे. ५जी मुळं गावागावांत क्रांती होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात क्रांती झाली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये ५जी पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. जिओ ची ५जी सेवा भारतात विकसित झाली आहे, त्यामुळं त्यावर आता आत्मनिर्भर भारतचा शिक्का नोंदवला गेला आहे. भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून, आम्ही जे काही दाखवलं आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही नेतृत्व करण्यास तयार आहोत, असंही मोदींनी स्पष्ट केलं. आज देशाच्या वतीनं, दूरसंचार उद्योगाच्या वतीनं १३० कोटी भारतीयांना ५जी च्या रूपानं एक अद्भुत भेट मिळाली आहे. ५जी ही संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयांचं खूप खूप अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले.
एक काळ असा होता, जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्ग गरीब लोकांच्या क्षमतेवर शंका घेत होता. गरिबांना डिजिटलचा अर्थही कळणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पण, देशाच्या सामान्य माणसावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. सरकारनं स्वतः पुढं जाऊन डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा केला आहे. सरकारनं स्वत: अँपद्वारे नागरिक केंद्रित वितरण सेवेला प्रोत्साहन दिलं. मग ते शेतकरी असो किंवा छोटे दुकानदार, आम्ही त्यांना अँपद्वारे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला आहे. आपल्या देशाच्या ताकदीकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाईल. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही ५जी सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील १३ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
चांदणी चौकातील पुलरविवारी पाढणार, शनिवारी रात्रीपासूनच वाहतुक बदल
कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ‘ग्रीन सिग्नल’