आशिया कप महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला. भारताने मलेशियासमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मलेशियाने ५.२ षटकात २ बाद १६ धावा केल्या असतानाच पावसाने सुरूवात केली. त्यानंतर सामन्यात एकाही षटकाचा खेळ झाला नाही. मलेशियाच्या डावाची पाच षटके पूर्ण झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला३० धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारताकडून मेघनाने सर्वाधिक ६९ धावांची तर शेफाली वर्माने ४६ तर रिचा घोषने नाबाद ३३ धावांची खेळी करत भारताला १८१ धावांपर्यंत पोहचवले होते.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा केल्या. सभिनेनी मेघना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये ४७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मेघनाने-शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मेघनाने अर्धशतकी खेळी केली. तिने ५३ चेंडूत ६९ धावा केल्या. यामध्ये तिने ११ चौकार आणि एक षटकार खेचला. ती बाद झाल्यावर शफालीने रिचा घोष हिच्यासोबत ४२ धावांची भागीदारी केली. शफाली ४६ धावा करत बाद झाली. तिने एक चौकार आणि तीन षटकार खेचले, तर किरण नवगिरे ही भोपळाही फोडू शकली नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. उपकर्णधार स्मृती मंधानाबरोबर स्नेह राणा, पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग ठाकुर यांनाही आराम दिला गेला. त्यामुळे एस मेघना आणि किरण नवगिरे यांच्यासोबत राजेश्वरी गायकवाड आणि सभिनेनी मेघना यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले.दुपारनंतर दुसऱ्या डावात पावसाची शक्यता असल्याने भारतीय कर्णधार हरमनप्रीतने राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा या दोन्ही फिरकी गोलंदाजांकडून गोलंदाजीची सुरुवात केली. ५.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. पाऊस न ओसरल्याने कमीत कमी पाच षटकांचा खेळ झाला असल्यामुळे, भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३० धावांनी विजयी घोषित केले. भारतीय संघाला पुढील सामना युएईविरूद्ध खेळायचा आहे. त्यानंतर पाकिस्तान व बांगलादेश विरुद्ध अखेरचे दोन सामने खेळले जातील.
हे ही वाचा:
दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण
Video Viral : टिकटॉक स्टार महिला कंडक्टर निलंबित,ऑन ड्युटी रिल्स पडलं महागात