उद्याचा दिवस शिवसेनेसाठी नक्कीच खास ठरणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदा मोडीत निघाली असून यंदा मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आवाज घुमणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बीकेसीत येणाऱ्या शिंदे गट समर्थक कार्यकर्त्यांसाठी जेवणाची आणि मैदानातील आसन व्यवस्था सज्ज आहे. तर तिकडे शिवाजी पार्कातही तयारीला वेग आला आहे. पोलिसांनी दोन्ही मैदानाची पाहणी केली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात दाखल होणार आहेत.
हेही वाचा :
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा
परंतु एक अचंबित करणारी एक बातमी समोर येत आहे. या मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी या महामार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसताना नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्यानं आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.
सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांची मात्र बुधवारी रॅली निघाली. अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला आहे. तो याच महामार्गवरुन रवाना झाला. म्हणजे जालना ते वैजापूरपर्यंत हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. जालना ते वैजापूर १०० किमी अंतर आहे, पण हा मार्ग खास राजकारण्यांसाठी खुला करण्यात आला असल्याचं दिसून आलं आहे.
ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी बीडहून चालत मुंबई गाठली आहे. गेल्या १९ दिवसांपासून सुरु असलेला हा पायी प्रवास अखेर नवी मुंबईत विसावला आहे. महिला शिवसैनिकही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाल्या आहेत.