राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविकास आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवाला अनुपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. अनेक वर्षे आपण अनेक मान्यवरांचे सत्कार पाहत आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते आणि राजकीय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेऊन तेही छगन भुजबळांबाबत बोलले असते, तर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा अधिक ठळकपणे समोर आला असता.”
“अशा एखाद्या घटनेने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रतिमेला धक्का लागणार नाही याची खात्री माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.
अजित पवार पुढे म्हणाले, “छगन भुजबळ एखाद्या कामात लक्ष घातल्यावर जीव ओतून काम करतात. राजकीय घडामोडी होतात, चढउतार येतात, परंतु त्यात डगमगायचं नाही. छगन भुजबळांवर कुठलेकुठले आघात घडलेत ते सर्वांना माहिती आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही. एक गोष्ट मी जरूर सांगतो, एखाद्या दुसऱ्या नेत्यावर तसे आघात झाले असते, तर तो नेता खचून गेला असता, घरी बसला असता, त्याने राजकारण सोडलं असतं.”
“परंतु, छगन भुजबळांनी तसं केलं नाही. त्यांनी हे सर्व सहन केलं आणि पुन्हा नव्या उमेदीने जनतेची काम करण्याचा ध्यास मनात ठेवला. छगन भुजबळ पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले. तेव्हा बॉम्बेचं मुंबई नाव करताना त्यांचा फोटो प्रत्येक मुंबईकराच्या आणि महाराष्ट्रवासीयाच्या मनावर कोरला गेला,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
प्रवाशांचा त्रास वाढणार, मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग ४ दिवस बंद राहणार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा