अखेर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. आज ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारचा खोके सरकार म्हणून उल्लेख केला आहे.
आज पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला. त्यासाठी लटकेंनी मुंबई हायकोर्टात जावं लागलं होतं. शेवटी कोर्टाने पालिकेला फटकारल्यानंतर लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देऊन मशाल हे चिन्ह दिलं आहे. त्याच नावासह आणि चिन्हावर ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणूक लढवत आहे.
”आज प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. अशावेळी समोरुन कुणीही लढत नसतं. परंतु खोके सरकारने एका महिलेला सतावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचं काळं मन समोर आलेलं आहे. त्यामुळे आता माणुसकी विरुद्ध खोके सरकार, अशी लढाई सुरु झालीय” अशा भावना आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवल्या. ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे गटाचे नेते अंधेरीमध्ये दाखल झालेले आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
हे ही वाचा :
एक हजार एक टक्के ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित – विनायक राऊत