मुंबई: मंगळवार प्रमाणे आज ही पावसाची संतत धार कायम आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाच्या सरी कायम आहेत. (Mumbai Monsoon Update) आज ही पावसाची हजेरी कायम आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. याचा फटका रस्त्यावरील वाहतूक आणि लोकलला बसल्याचे पहायला मिळतंय. हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. ७, ८ आणि ९ जुलै पर्यंत धो धो पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सोमवारपासून शहर आणि उपनगरांमध्ये धो धो पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील आणखीन तीन दिवस हा पाऊस असाच कायम असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि विदर्भ या भागांत अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन (Mumbai Monsoon Update) विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दरड कोसळण्यामुळे शनिवापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगडमध्ये सोमवार पेक्षा मंगळवारी पावसाचा जोर कमी होता. रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कायम होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत यंदा उच्चांकी पावसाची १५७ मिमी इतकी नोंद झाली. तसेच जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, अर्जुना आणि कोदवली या नद्यांचे पाणी अधून मधून धोक्याची पातळी पार करण्यासाठी परिस्थिती निर्माण होते. जगबुडीने नदीने सोमवारी धोक्याचीही पातळी गाठली ही होती. अर्जुना नदीवरील कालवा फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.