यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वेळी आलेला महापुर आठवता यावर्षी नागरिक सतर्क झाले आहेत. मुंबईसह, ठाणे आणि कोकण किनारपट्टीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीला मंगळवारी (panchaganga river flood) पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले.
सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी पंचगंगेची पातळी 15 फुटांपर्यंत पोहोचली होती.
मंगळवारी सकाळी पाण्याची पातळी 24.5 फुटांपर्यंत गेली. आज ती सकाळी 9 पर्यंत 31 फुटांवर पोहोचली. दर दोन तासाला अर्धा फुटाने पाण्याची पातळी वाढत आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून, धोका पातळी 43 फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढच्या 24 तासांत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामूळे प्रशासनाने नागरिकांना आणि एनडीआरएफ ला सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.