परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्याला मदतीचा हात द्यावा अशी माफक अपेक्षा आहे. सरकारकडूनही नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. मात्र हे दौरे पर्यटन दौरे तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा मारताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलं असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. त्यात आता अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना प्रश्न विचारला की, अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा? यावेळी त्यांनी एक शेर देखील ट्वीट केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार काहीसे गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. मात्र, सत्तार यांचा “दारू पिता का?” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तर, या व्हिडीओवरून काहींनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.
पंचनाम्यानंतरच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र अद्याप संपूर्ण पंचनामे झाले नसून पुढच्या एक आठवड्यात संपूर्ण पंचनामे होतील. त्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यातून त्याचा अहवाल येईल आणि कॅबिनेटमध्ये या सर्व बाबी मांडण्यात येतील. त्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतील, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
हे ही वाचा :
अकोल्यात मृत तरुण तिरडीवर उठून बसला; समोर आलं धक्कादायक कारण…