गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटला आहे. या शाब्दिक युद्धात असंसदीय शब्दांचा वापरदेखील झाला आहे. भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. आता हा आरोप कोर्टात जाण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू यांनी या आरोपावरून आता कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस बजावणार आहेत. मला किती खोके दिले हे सांगा, अशी विचारणा ते या नोटिशीतून करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. उद्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं.
हेही वाचा :
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या मतदार संघात जाऊन ‘मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या,’ असे म्हणत टीका केला होती. त्यावर लगेच बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत ‘आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीतही नसता,’ असा टोला लगावला होता.
या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. मी सामोरे जायला तयार आहे. मी कधीही तयार आहे. मला तर आनंद होईल. चौकशी झाली तर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. लागलेला डाग हा कधी तरी पुसला पाहिजे. आरपारच्या लढाईला मी तयार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
हा वाद नंतर वाढत गेला आणि आता तर हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहचले.रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्या समोर खासदार म्हणून काम करताना अचलपूर आणि मेळघाट या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये प्रहार या बच्चू कडू यांच्या पक्षाचे आव्हान आहे. नवनीत राणा यांनी या दोन मतदार संघांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही मंत्रीपद हवे आहे. त्यांनी त्यासाठी चांगलाच पाठपुरावा सुरू केला आहे. पण, यातून निर्माण झालेली अस्वस्थता आता दोन नेत्यांमधील शाब्दिक युद्धात परिवर्तित झाली आहे.