पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.
आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कैलास पाटील यांची भेट घेतली. यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे उपोषण स्थळी उपस्थिती होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाटील यांची फोनवर चर्चा झाली. आमदार कैलाश पाटील यांच्याशी फडणवीस यांनी संवाद साधला आणि आश्वासन दिलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्याशीही कैलाश पाटील यांच्यासोबत फोन वर चर्चा झाली. उध्दव ठाकरे यांनी कैलाश पाटील यांना उपोषण मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर कैलाश पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, नारळ पाणी पिऊन पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २०२० मधील पीक विमा, अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला १२०० कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते.
दरम्यान त्यांच्या याच उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता. तर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाटील यांची भेट घेतली. तर विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.
याबाबत बोलतांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, नुकसानभरपाईचे उस्मानाबाद जिल्ह्याला २८२ कोटी रुपये येणे आहे. त्यातील अतिवृष्टीचे ५९ कोटी रुपये उद्या किंवा परवापर्यंत देण्याचा शासन निर्णय घेतला जाणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा ६० कोटीचा नुकसानभरपाईचा निधी देखील सोमवारपर्यंत जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही विषय होते ते सर्व मार्गी लागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आमदार कैलास पाटील उपोषण मागे घेत असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली.
हे ही वाचा :
भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस
जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत