देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला मद्य सम्राट विजय मल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे. कारण सुप्रीम कोर्टात त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलानं या केसमधून माघार घेतली आहे. मल्ल्याला वैतागूनच या वकिलानं हा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना तशी परवानगी देखील दिली आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अॅड. अगरवाल यांनी सांगितलं की, मला माहिती आहे विजय मल्ल्या हे ब्रिटनमध्ये आहेत. पण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधता येत नाही. माझ्याकडे त्यांचा ई-मेल आहे, पण मी त्यांना ट्रेस करु शकत नाही. अशा परिस्थिती मी त्यांची बाजू मांडू शकत नाही, मला यातून मोकळं करावं. विजय मल्ल्याच्या वकिलाने केलेली ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने त्यांना सांगितलं आहे की, न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये विजय मल्ल्याचा ई मेल अॅड्रेस नोंद करावा, त्यांचा पत्ता असेल तर तोही द्यावा.
बँक फसवणूक प्रकरणात २०१७ साली पहिला खुलासा करण्यात आला. मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर विमान कंपनीचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने स्टेट बँक, आयडीबीआय आणि अन्य काही बँकांचे मिळून ९००० कोटींचे कर्ज बुडवल्याचे उघड झाले. त्यानंतर पळून गेलेला विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहात आहे. मल्ल्याला भारताकडे सोपवण्यात यावं, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. इंग्लंडच्या न्यायालयातही मल्ल्याविरोधात केस चालू आहे. या आधी विजय मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासोबतच त्याला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आला होता. न्यायालयाने मल्ल्याला आठ टक्के व्याजासह ४ कोटी डॉलर (सुमारे ३१,७६,४२,००० रुपये) जमा करण्याचे निर्देश दिले होते.
चीनमध्ये सरकारच्या विरोधात ‘या’ भारतीय गाण्याचा होतोय वापर
“शत्रूंनी आम्हाला लक्ष्य केले तर… “:’संरक्षण मंत्रालयाकडून महत्वाची माहिती