शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut News) यांना बुधवारी जामीन मिळाला. बुधवारीच ते न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले. दरम्यान, आज त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका भाषण संजय राऊत यांना अटक होईल, असं भाकित वर्तवलं होतं. त्यांचा संदर्भ देत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते.
“तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही. कोठडीतले दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही.
कोर्टाने मला जामीन दिला आहे. पूर्ण देशात जल्लोषाचा माहोल झाला. मी टिपणी करणार नाही, ना ईडी ना ज्यांनी कट रचला त्यांच्यावर. त्यांना आनंद मिळाला असेल तर ठिक. माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगलं, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहतं. मात्र अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हाही असं घडलं नव्हतं. शत्रूबाबतही घडलं नसेल. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही, सिस्टिमला दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी सर्वांना मिळते, त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत यांनी म्हटलं की,… राज ठाकरेंनी एका भाषणात टीका करताना सांगितलं होतं की ‘राऊतांना अटक होईल. त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टीस करावी.’ मला त्यांचा सांगायचंय की राजकारणात आपला शत्रू तुरुंगात जावा अशी कुणाचीही भावना असू नये! यावेळी संजय राऊत यांनी वीर सावरकर यांचाही उल्लेख केला. सावकरांपासून आणीबाणीचे अनेक नेते तुरुंगात होते. माझी अटक बेकायदेाशीर होती, असं कोर्टानं म्हटलंय. तुरुंगातील अनुभव सांगण्यासारखा नाही. पण एकांताचा हा काळ सत्करणी लावल्याचंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.
जेलमध्ये राहणं आनंदाची बाब नाही. मोठमोठ्या भिंती असतात, त्या भिंतींशी बोलावं लागतं. वीर सावरकर दोन वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये राहिले, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहिले असतील? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
महाराष्ट्रात नवं सरकार बनलं आहे, काही निर्णय महाराष्ट्र सरकाने चांगले घेतले आहेत त्याचं स्वागत करेन, विरोधासाठी विरोध करणार नाही. जे देश, राज्य किंवा जनतेसाठी भल्याचं असेल त्याचं स्वागत करेन, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत, जेव्हा मी पेपर वाचायला मिळत होता, तेव्हा हे पाहात होतो, गरिबांना घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे चांगले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे नसतात, राज्याचे असतात. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटणार. त्यांना सांगणार माझ्यासोबत काय घडलं ते. तसेच हे सरकार घटनाबाह्य आहे, त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. पण त्यांनी घेतलेले काही मोजके निर्णय घेतले त्याबद्दल मी बोललो. जे लोक संवैधानिक पदावर बसले आहेत, त्यांचीशी देशाच्या चांगल्या गोष्टीबाबत चर्चा व्हायला हवी. तसेच मी जेलमध्ये वाचलं होतं, फडणवीस म्हणाले होते, आपल्या महाराष्ट्रात कटुता वाढली आहे, ती कमी व्हावी, त्याचं मी स्वागतही केलं होतं.
भारत जोडो यात्रेचं स्वागत करतो, माझी तब्बेत चांगली असेल तर जरुर मी त्यांच्या यात्रेत सहभागी होईन, त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हे ही वाचा :
Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर
हृतिकची प्रियसी सबा आझाद दिसणार रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये