‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) येत्या ६ दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयाने ‘मला नवरी झालेल्या पाहायला तुम्ही सज्ज आहात का? अशी पोस्ट टाकली होती. दुसरीकडे हार्दिकनेदेखील ‘घरचं केळवण’ असं म्हणत एक पोस्ट टाकली होती. हार्दिकचा हा फोटो त्याच्या एका मैत्रिणीने इन्सास्टोरीवर ठेवला आहे. या फोटोवर तिने ‘फक्त सहा दिवस बाकी’ असा हॅशटॅग वापरला होता.
View this post on Instagram
हार्दिक आणि अक्षयाने ३ मे २०२२ रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर साखरपुड्याच्या सहा महिन्यानंतर ते लग्न करत आहेत. मध्यंतरी त्यांचे केळवण आणि अक्षयाची साडी विणतानाचे फोटो व्हायरल झाले होते. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या १ किंवा २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यांचे लग्न पुण्यात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते लग्न करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
हे ही वाचा :
वादग्रस्त वक्तव्यानंतर रामदेव बाबांचा माफीनामा