spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केलीय का?, प्रसाद लाडांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी केला सवाल

कर्नाटकाच्या आरेरावी विरोधात भाजप फक्त आरेला कारे देण्याची भाषा करत आहेत. तुम्हाला उद्यापर्यंत कळेल विरोधक काय करतात ते, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

कर्नाटकाच्या आरेरावी विरोधात भाजप फक्त आरेला कारे देण्याची भाषा करत आहेत. तुम्हाला उद्यापर्यंत कळेल विरोधक काय करतात ते, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे उद्या विरोधी पक्षाकडून कोणता मोठा निर्णय जाहीर होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं म्हटलं होतं. लाड यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही लाड यांच्या या विधानाचा समाचार घेतला. कोण प्रसाद लाड? सोड रे… ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

या भाजपचं डोकं फिरलंय. शिवाजी महाराजांची शक्ती आहे ना, ही शक्तीच यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे महाराजांची ही तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळेच हे लोक बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे? महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहीत आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. रायगडावर त्यांची समाधी आहे. तुम्ही नवीन नवीन शोध का लावत आहात? भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

कर्नाटकच्या आरेला कारेनं उत्तर देऊ, असे वक्तव्य भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, कर्नाटक महाराष्ट्रात घुसलंय, तुम्ही त्यांच्या ‘आरे’ला ‘कारे’ कधी करणार? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांची आहे. तुम्हाला उद्यापर्यंत दिसेल विरोधी पक्ष काय करणार ते असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जसं नीती आयोग स्थापन करून त्यावर आपल्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने नवीन इतिहास संसोधन मंडळ निर्माण करून लाड, द्वाडांची नेमणूक केलीय का? ते महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार आहेत का? कठीण आहे, असा संतापत त्यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे. ज्या ठिकाणी दोन्ही नेते जाणार आहेत, तिथेच कर्नाटकाने पोस्टर लावली आहेत. त्यावरूनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. हे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान आहे. सरकारला दिलेलं आव्हान आहे. महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे, असं ते म्हणाले.

भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणतात, कर्नाटकाच्या आरेला कारेनं उत्तर देऊ. अरे आरे वाल्यांनो आणि कारे वाल्यांनो कर्नाटक घुसलं आतमध्ये. तुम्ही कधी कारे करणार? नागपूरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर चिटकवले आहेत. कोणी म्हणतंय गुजरातला येऊन बघा. कोणी म्हणतंय कर्नाटकाला येऊन बघा. कुठे आहे महाराष्ट्र तुमचा. चुल्लूभर पानी में डुब जाव. तशी तुमच्यावर वेळ आली आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. तुम्हाला उद्यापर्यंत समजेल विरोधी पक्ष काय करतो ते, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांना हटवण्याबाबत राष्ट्रपती काही करणार नाही. ते फक्त पत्राची पोच देतात. कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच करायला हवी. सध्या सर्व संस्थांची अवस्था सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजी राजे असतील ते आपल्या पद्धतीने जागरुकता निर्माण करत आहे. विरोधी पक्षही आपली भूमिका उद्या किंवा परवाच भूमिका जाहीर करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

नितीन गडकरींचं नाव घेत सुषमा अंधारेंनी केला गोपीनाथ मुंडेंविषयी मोठा गौप्यस्फोट

जेलमध्ये डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss