मुंबई : राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून सत्ता संघर्षाचा खेळ पहायला मिळतोय. बंडखोरी नंतर शिंदे गट आणि शिवसेना आता कोर्टात आमने सामने आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काहींनी उघडपणे शिवसेनेतून थेट शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. आज शिवसेना आमदार संतोष बांगर आपल्या समर्थकांसह सकाळीच मुंबईत दाखल झाले.
आमदार संतोष बांगर यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारदेखील हजर होते. एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगरच जिल्हाप्रमुख असं जाहीरपणे म्हणत थेट उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला ललकारले. एकनाथ शिंदेंनी शक्तीप्रदर्शनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना म्हटले, “एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. संतोष बांगर नेहमी सुख आणि दुखात धावून जातात. गेल्या महिन्याभरातील घडामोडी, प्रवास आपण पाहिला आहे. पण हे सागंण्यास मला अभिमान वाटतो की, एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांची दखल फक्त राज्य, देश नाही तर जगभराने घेतली आहे”.
हेही वाचा
संतोष जुवेकरची झाली ‘या’ अभिनेत्यासोबत हाणामारी
“४०-५० लोक एका भूमिकेत असून ही भूमिका साधी नाही. ही हिंदुत्वाची आणि राज्याला पुढे नेणारी भूमिका आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच संतोष बांगर यांना तूच जिल्हाप्रमुख म्हणून तू कायम आहेस असं जाहीर केलं. इतकी ताकद मागे असताना इतर दुसरं कोण तिथे काम करु शकतं? असा प्रश्नही त्यांनी विचारला.