काही दिवसांपासून महाराष्ट्र (Maharashtra) – कर्नाटक (Karnataka) सीमावाद चांगलाच पेटला आहे. काल दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट झाली. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट (Tweet) करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी का पानी करावं. तसेच यामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच सीमावादा प्रश्नी बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवे (Harish Salve) यांची नियुक्ती करावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, ‘बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. जे ठरलंय त्याप्रमाणे बोम्मईंनी वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं.
छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भाजप नेत्यांकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. तसेच महापुरुषांचाही अपमान करणारी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली. या संदर्भात आक्रमक भूमिका घेत मविआकडून महामोर्चा पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात आज मविआची महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या महामोर्चासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे.
हे ही वाचा :
मुंबई पोलिसांकडून सोमय्या पिता पुत्रांना मोठा दिलासा