चिपळूण : आज महाराष्ट्रच्या अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. गेले अनेक दिवस राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर कुठे दरड कोसळण्याच्या घटना ही घडल्या आहेत. तर चिपळूण मधील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अखेर नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अद्याप शहरात पाणी शिरलेले नसले तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रात्रभर मुसळधार पाऊस सुरूच होता. आज ही सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून म्हणजेच ७.२० मीटर यावरून वाहत आहे. ७ मीटर ही जगबुडी नदीची धोकादायक पातळी आहे. मागील आठ दिवसात जगबुडी नदीने अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी अजूनही रस्त्यावर पाणी शिरले नाही. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दापोली खेड मार्ग कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो. मुंबई – गोवा महामार्गावरील नवीन पुल मात्र वाहतूकीसाठी खुला आहे. तिथपर्यंत पाणी पोहचलेले नाही.
हेही वाचा :
अतिवृष्टी इशारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर
जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली असल्याने नजिकच्या अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक, वेरळ व सुकीवली येथील वाड्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड पालिका परिसरातील नदीकाठी असलेल्या झोपडपट्टीतील ३७ कुटुंबांना गेल्याच आठवड्यात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकचे १८ जवान खेड येथे दाखल झाले आहे.