Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान (Gram Panchayat Voting) होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. प्रत्येक गावात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.
राज्यात आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडते आहे. यासाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली असून हजारो उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही मतदान होत आहे. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. तसेच सिंधुदुर्ग २९३, कोल्हापूर ४३१, सोलापूर, १४१८, नागपूर २३६, नाशिकमध्ये १९६, अहमदनगर १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर राज्याच्या विविध जिल्ह्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये रायगडमधील ५०, बीडमधील ३४, कोल्हापूरमधील ४३, सांगलीतील २८, सिंधुदुर्गमधील ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.