Maharashtra Winter Session 2022 : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सीमावादावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बेळगावात लोकप्रतिनिधींना जाऊ दिलं जात नाहीय, तर तिथले मुख्यमंत्री उघड उघड महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं करत आहेत तरी सरकार काही बोलत नाही असा हल्लाबोल शिंदे सरकारवर केला. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सीमावादाबाबत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीची सविस्तर माहितीच सभागृहात दिली.
सीमावासीय ठराव करत आहेत. कर्नाटकात जाण्याचे हे ठराव आहेत. त्यामागे कोणते पक्ष आहेत याची माहिती आम्हाला पोलिसांकडून आली आहे, असा खळबळजनक दावा करतानाच जे इतक्या वर्षात झालं नाही ते आम्ही करून दाखवलं. ४८ गावांची २००० कोटींची योजना कालच मंजूर केली. अडीच वर्षात तुम्ही सीमावासीयांच्या योजना बंद केल्या. त्यांचं अनुदान बंद केलं. तुम्ही काय सांगता सीमावासियांबद्दल? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिंदे यांच्या दाव्यानंतर सीमावर्ती गावांना कर्नाटकात जाण्यासाठी ठराव करायला लावणारा राजकीय पक्ष कोणता? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
“सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. या गोष्टीचं राजकारण केलं जाऊ नये. राजकारण करण्यासाठी इतर बरेच मुद्दे आहेत. पण या प्रश्नावर आजवर कोणत्याच केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली नव्हती. अमित शाह यांनी यात लक्ष घालून मध्यस्थी केली. यावेळी मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू तिथं मांडली. यात बोम्मईंकडून केली जाणाऱ्या ट्विट्सचाही मुद्दा उचलला. त्यावर बोम्मईंनी ते ट्विटस आपण केलेली नसल्याचं म्हटलं. तसंच ते ट्विट कुणी केलीत याचीही माहिती त्यांच्या सरकारनं शोधून काढली आहे. तसंच या ट्विट्समागे कोणता पक्ष आहे याचीही माहिती कळाली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा तिथल्या बांधवांच्या पाठिशी कसं उभं राहता येईल हे पाहायला हवं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षनेत्याने सीमावादाचा मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. मी आणि देवेंद फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे गेलो होतो. पहिल्यांदाच या प्रश्नावर देशाच्या गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली. हे पहिल्यांदा घडलं. त्याबद्दल तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचं आम्ही अमित शहा यांना सांगितलं. आम्ही महाराष्ट्राची ठोस बाजू घेतली. महाराष्ट्राच्या गाड्या अडवल्या जातात, जाळपोळ होते. त्यामुळे असा प्रकार होऊ नये अँक्शनला रिअँक्शन होऊ शकते असं आम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं. त्यावर गृहमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तंबी दिली. अशा प्रकारचं काही प्रकरण होऊ नये. दोन्हीकडच्या लोकांना त्रास होऊ नये, असं त्यांनी बजावल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीनंतर शहा मीडियासमोर आले. मीडियासमोर त्यांनी बैठकीची माहिती दिली. शहा यांनी सीमाप्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्याचं अभिनंदन करायला हवं होतं. यापूर्वी कोणती सरकारं महाराष्ट्र आणि कर्नाटकात होती हे सर्वांना माहीत आहे. कोणत्या सरकारने परवानगी दिली याची माहिती घ्या. यात राजकारण करू नका. आम्ही राजकारण करत नाही. राजकारण करायला विषय आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना खडसावलं.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारची अशी दडपशाही योग्य नाही, सरकरने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अजित पवार संतप्त