आज सगळीकडे मकर संक्रांतीची रंगत ही धुमधडाक्यात सुरु आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सर्वचजण उत्साही दिसून येत आहेत. आजच्या दिवशी ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा दिल्या जातात. हाच सर्व उत्साह पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिसून येत आहे. आज या मकर संक्रातीच्या सणानिमित्त रुक्मिणी मातेस वाणवसा करण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाल्या आहेत. महिला आपल्या शेतातील नवीन धान्य घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini temple) आल्या आहेत.
आज मकर संक्रांतीनिमित्त पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर हे भोगीच्या ३० प्रकारच्या भाज्यांनी सजवण्यात आले आहे. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या, फळे आणि फुलांच्या मदतीने ही सर्व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भक्त अमोल शेरे यांच्या कुटुंबाने ही सजावट केली आहे. त्यामुळं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे चित्र विठ्ठल मंदिरात तयार झाले आहे. शेतातील ऊस, गव्हाच्या लोम्ब्या, ज्वारी आणि मक्याची कणसे, बोरे, जांभूळ, ढाळा यासह दोडके, भोपळा, कोबी, फ्लॉवर, सिमला मिर्च अशा जवळपास ३० प्रकारच्या दीड टन भाज्यांचा या सजावटीत पहिल्यांदा वापर झाला आहे.
आजच्या दिवशी तीळ गुळाबरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा आणि कुटुंबाच्या भरभराटीचा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे. या दिवशी भोगी करणे, वोवसायला जाणं यासारख्या रिती, परंपरा आजही जोपासल्या जातात. त्यासाठीच राज्यभरातून हजारो महिला सध्या पंढरपूरमध्ये आपल्या शेतात पिकलेले नवंधान्य अर्पण करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. भल्या पहाटेपासून मंदिर परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेला आहे. संक्रांतीमुळं आज दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावरून पुढे गेली आहे. महिलांसोबत गैरप्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
Tata Mumbai Marathon, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईकरांनी घेतली मोठी धाव
कोण आहेत खाशाबा दादासाहेब जाधव? ज्यांच्यासाठी गूगलने शेअर केलंय खास डूडल
चीन सीमेवरील कोणत्याही परिस्थितीसाठी भारत तयार आहे, लष्करप्रमुखांचं मोठं विधान