भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्याचा पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. मनगटाला दुखापत झाल्याने ऋतुराज मालिकेतून बाहेर जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. वृत्तानुसार, त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले आहे. ऋतुराज हा प्रतिभावान खेळाडू असून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. महाराष्ट्र आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात गायकवाड संघाचा भाग होता. मात्र, यात तो विशेष काही करू शकला नाही. एका डावात ८ धावा करून तो दुसऱ्या डावात खाते न उघडता बाद झाला.
टीम इंडिया शुक्रवारी रांचीमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. याआधीही ऋतुराज संघाबाहेर गेल्याची बातमी आली आहे. क्रिकबझवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार गायकवाड मनगटाच्या दुखण्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले आहे. येथे त्यांची तपासणी केली जाईल. मात्र ऋतुराजबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याआधीही दुखापतीमुळे ऋतुराजला खूप त्रास झाला होता आणि याच कारणामुळे त्याने यापूर्वीही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी गमावली होती. मनगटाच्या समस्येमुळे गायकवाड गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकला नव्हता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर पडला होता. आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. मात्र, ऋतुराजच्या जागी टीम इंडियात कोणाला स्थान मिळणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशेष म्हणजे ऋतुराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत ९ टी-२० सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने १३५ धावा केल्या आहेत. त्याने एक वनडे सामनाही खेळला आहे. मात्र, त्यानंतर तो भारताकडून खेळू शकला नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. हा त्याचा पहिला वनडे सामनाही होता.
हे ही वाचा:
India 74th Republic Day, राजपथावरील आजचा परेड अगदी वेगळा, पहा या परेड संदर्भात खास माहिती