राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष दर दिवशी नवे वळण घेत आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी शिवसेनेतून बाजूला होत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नाही नाही म्हणता पक्षाला अजूनही गळती सुरूच आहे. सेनेतून बाजूला झालेल्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत आपल्या मनातील खदखद प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली. शिवसेना पक्षा व्यतिरिक्त ही अनेक पक्षातील नेते, राजकीय विश्लेषक, प्रसार माध्यमांकडून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मतं मांडली जात आहेत.
हेही वाचा
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्लातून आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा
सध्या महाराष्ट्राला मंत्रिमंडळ स्थापनेचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतेत विराजमान आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा सर्व प्रवास म्हणजे पक्षातील उठाव आहे असं ते सांगतात. शिवसेनेला बंड आणि उठाव या गोष्टी काही नवीन नाही. शिवसेनेतील सर्वात मोठा उठाव १९९१ मध्ये झाला. शिवसेनेत आतापर्यंत झालेले ५ बंड याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी टाईम महाराष्ट्र ला दिलेल्या मुलाखतीत आपले मत मांडले व काही जुन्या आठवणींना उजाळा ही दिला.
सेनेतील पहिले बंड
शिवसेनेत झालेल्या पहिल्या बंडाबद्दल आपलं मत मांडताना बाळा नांदगावकर म्हणाले, १९९२ मध्ये प्रथमच महानगरपालिकेत नगरसेवक झालो. ९० च्या दरम्यान छगन भुजबळ यांनी मंडल आयोगाच्या बाबतीत आपली नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे भुजबळांच्या समोर कोण उभं राहणार ही चर्चा सुरु झाली. तेव्हा नाना पाटेकर, आनंद दिघेंची, मनोहर जोशी यांची नावं समोर होती. तेव्हा राज साहेबांनी मला विचारलं तु भुजबळांच्या विरोधात उभा राहशील का ? तेव्हा मी होकार दिला. त्यावेळी नागपाडा मतदार संघात मी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो.
शिवसेनेचा जाएंट किलर
जाएंट किलर ही उपाधी मिळाल्यानंतर त्यावेळी शिवसेनेतील आपले स्थान आणि एकूणच वागणुकीबद्दल सांगताना नांदगावकर म्हणाले, तेव्हा शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणं या गोष्टीलाच खूप महत्व होतं. निवडणुक जिंकुन आल्यावर मी बाळासाहेब आणि असंख्य शिव सैनिकांच्या गळ्यातील ताईत झालो होतो. त्यानंतर मी जनतेतून सतत निवडून येत होतो. या दरम्यान ठाकरे कुटुंबाकडून मला भरपूर प्रेम मिळालं. असं नांदगावकर म्हणाले.
आक्रमकपणा राहिलेला नाही
यापूर्वी सेनेत बंड झाले तेव्हाचा शिवसैनिक आक्रम दिसला पण आता झालेल्या बंडानंतर जे चित्र पहायला मिळतंय त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिवसैनिक आणि आत्ताची परिस्थिती यातील फरक सांगताना बाळा नांदगावकर म्हणाले, बाळासाहेबांनी उभी केलेली आक्रमक धाटणीची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती सोपवल्यानंतर सेनेला कॉर्पोरेटचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे पुन्हा आक्रमक बनवणं कठीण आहे. आत्ताच्या तरूण उत्तम शिकलेल्या पिढीसोबत राजकरणात पुढे जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असल्यामुळे आत्ता तो आक्रमकपणा राहिलेला नाही हे खरं आहे. शिवसेनेत पूर्वी जो दरारा होता तो उद्धव ठाकरेंना जपता आला नाही.
ठाकरे विरुद्ध ठाकरे
ठाकरे विरुद्ध ठाकरे या सद्य परिस्थितीबद्दल विचारले असता बाळा नांदगावकर म्हणाले, बाळासाहेबांनी कधीच शरद पवारांना जवळ केले नाही. नेहमी त्यांच्याविरुद्धच ते बोलायचे. आणि आता उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना जवळ केले आहे. या दरम्यान त्यांनी हिंदुत्त्वाची भूमिका ही बाजूला ठेवली. मागे मी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं ही इच्छा व्यक्त केली. पण तसं काही घडलं नाही. आता खरी शिवसेनेला मनसेची गरज आहे त्यामुळे आता जर शिवसेना आणि मनसेने युती केली तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी राजकीय स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि जरी तसं नाही झालं तरी माझा माझ्या पक्षावर विश्वास आहे. असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.