एमपीएससीच्या सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे आणि याचसाठी २५ जुलै रोजी याचासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. मात्र, या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाणे (एमपीएससी) ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 23, 2022
राज्यसेवा परीक्षेमध्ये बदल करून वर्णनात्मक पद्धत आणि यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम आणण्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. हा बदल २०२३ पासून लागू करण्यात येईल असेही एमपीएससी कडून स्पष्ट करण्यात आले होते. तसेच वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा नव्या अभ्यासक्रमही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परंतु, उमेदवाराकडून परीक्षा पद्धत व अभ्यासक्रमांच्या बदलाचे स्वागत जरी करण्यात आले असले तरी या बदलांशी जुळवून घेण्याकरिता चार ते पाच महिन्यांचा कालावधी पुरेसा नसून या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी २०२५ पासून सुरुवात करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
नवी परीक्षा योजना आणि नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागणीची दखल न घेतल्यास पुण्यात २५ जुलैला आंदोलन करण्याबाबतचे संदेश समाजमाध्यमांद्वारे फिरत आहेत. तीन-चार वर्षांपासून वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?, बदललेल्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी मिळणारे चार ते पाच महिन्यांचा कालावधी पुरेसा नाही, अशा अचानक लागू केलेल्या बदलामुळे गोरगरीब मुले यूपीएससीच्या मुलांसमोर टिकणार नाहीत आणि स्पर्धेतून बाहेर फेकले जातील असे विद्यार्थ्यांचे मत आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.