सिंधुदुर्ग : शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा आज पासून सुरु झाला आहे. या दौऱ्या दरम्यान, आदित्य ठाकरे सिंधुदुर्गतल्या कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहरातील शिरोळ ते कात्रज चौक येथे भेट देणार आहेत. कोल्हापूर नंतर पुण्यात देखील शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा आदित्य ठाकरे पूर्ण करणार आहेत.
आता सध्या आदित्य ठाकरे हे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात आहेत. तिथूनच ठाकरे यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले,” महाराष्ट्र कधीच गद्दारी खपवून घेत नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीत या वेळी त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यातील हे नाट्य दीड ते दोन महिन्यांचं असून, हे गद्दार सरकार कोसळणारच आहे. येथील चिपी विमानतळाचा पाठपुरावा उद्धव ठाकरेंनी केला. मात्र, काही लोक कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले मात्र, सर्वांना माहिती आहे की याचे काम कुणी केले आहे”.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, ” राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, तो कधी होईल याची कुणालाच कल्पना नाही, राज्यात सध्या केवळ दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आहे. मात्र, यात नेमकं कोण मुख्यमंत्री? आणि कोण उपमुख्यमंत्री? हेच कळत नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या परवानगीसाठी यांना दिल्लीला जावे लागते आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे व फडणवीस सरकारला लगावला.
हेही वाचा :
डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राष्ट्रवादीचा मोर्चा पोलिसांनी अडवला