२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पक्षामध्ये २ गट झाले आहेत. बंडानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. पण असं असलं तरी या सरकारमधील मित्रपक्षांमध्ये किंतू-परंतू असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पार पडलेला नाही. या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सातत्याने बैठकीचे सत्र सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गेल्या तीन दिवसांपासून या विषयावर चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठका पार पडत आहेत. पण तोडगा निघत नाहीय. या दरम्यान सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मुंबईत थांबून मंत्रिपद मिळतं, असं नाहीय. थांबलं, मग घेरा टाकला, हा काही पूजापाठचा थोडी विषय आहे. खातेवाटप आणि इतर गोष्टी आहेत, तीन इंजिनचं सरकार आहे. ते मजबूत होऊ शकतं किंवा तीन तिघाडा म्हणून बैकूपण शकतं. त्यामुळे जेवढं मजबूत होईल, तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असे बच्चू कडू म्हणाले.
पुढे बच्चू कडू म्हणाले की, “एकंदरीत चित्र असं आहे की, खातेवाटपावर काही गोष्टी, किंतू-परंतू असू शकतात. प्रत्येकाला असं वाटतं की, अजित पवार यांच्याकडे वित्त खातं नको जायला. कारण मागच्यावेळी त्यांनी जशाप्रकारे कारनामा केला तसं यावेळी सुद्धा घडू नये, अशी भीती आणि अपेक्षा आमदारांमध्ये आहे. अनेक आमदारांना त्यांच्या पत्नी विचारतात तुम्हाला मंत्री पदांसाठी फोन आला का? तुम्ही तर गुवाहाटीला गेले होते?”, अशी मिश्किल प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. “जशी निकालाची वाट पाहता तशी फोनची वाट पाहणे सुरू आहे. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालं पाहिजे. चांगल्या कॉलची कोणीही वाट पाहतं. यात वाईट काय?” असे बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा:
शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस
हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे