केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी 23 जुलै आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) उभारण्यात येणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या सर्वात मोठ्या पुतळ्याची पायाभरणी केली. कुरनूलजवळील नंदयाल जिल्ह्यातील मंत्रालयम येथे हा रामाचा पुतळा (Tallest Ram Statue) उभारण्यात येणार आहे. १०८ फूट लांबीचा हा पुतळा पंचधातूंनी बनवला जाणार आहे. जय श्री राम फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीसाठी ३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुतळ्याची पायाभरणी केली.
श्री राघवेंद्र स्वामी मठाने भगवान रामाच्या या पुतळ्यासाठी १० एकर जमीन दान केली आहे, जेणेकरुन या भूमीवर देशातील सर्वात मोठी रामाची मूर्ती उभारता येईल. हा पुतळा शिल्पकार राम वानजी सुतार बनवणार आहेत, ज्यांनी गुजरातमधील केवडिया येथे जगातील सर्वात मोठा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती केली आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनवणारे शिल्पकारच रामाची सर्वात मोठी मूर्ती बनवत आहेत. रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला आणि राम पुतळ्याची पायाभरणी केली. राघवेंद्र स्वामी मठाचे पुजारी सुबेंद्र तीर्थ स्वामी आणि माजी राज्यसभा खासदार टीजी व्यंकटेश हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबद्दल ट्वीट देखील केलं आहे.
केंद्रीय गृह अमित शाह म्हणाले की, तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेल्या मंत्रालयम गावात १० एकर क्षेत्रात पसरलेला हा प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण होईल. मंत्रालयम गाव हे राघवेंद्र स्वामींच्या मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे, असंही ते म्हणाले. या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही आहे, या तुंगभद्रेच्या काठावर महान विजय नगर साम्राज्याचा जन्म झाला, ज्याने आक्रमकांना हुसकावून लावत मातृभूमी आणि स्वधर्म बहाल केला. मंत्रालयम दास साहित्य प्रकल्पांतर्गत गृहनिर्माण, अन्नदानम, प्राणदानम, विद्यादानम, पिण्याचे पाणी आणि गोरक्षण असे अनेक विषय पुढे नेण्यात आल्याचंही अमित शाह म्हणाले. गृहमंत्र्यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री राम मंदिराची पायाभरणी करुन त्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला आहे. आता लवकरच श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून शेकडो वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम स्वतःच्या घरी विराजमान होणार आहेत. मंत्रालयम येथे श्री रामाच्या भव्य पुतळ्याच्या पायाभरणी प्रसंगी अमित शाहांनी संत राघवेंद्र स्वामी आणि दक्षिणेतील अत्यंत समृद्ध वैष्णव परंपरा आणि त्यातील सर्व संतांबद्दल आदर व्यक्त केला.
हे ही वाचा:
मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता
सुषमा अंधारेंचे राज्य सरकारवर आरोप