मुंबई :- काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट (Sanjay Shirsat Tweet) केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरे यांचे एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे. या ट्विटने राज्याचं राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळत असल्याची चर्चा सुरु झाली, दरम्यान संजय शिरसाट यांनी स्वतः माध्यमासमोर येत त्या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते ट्विट चुकून गेले. ते ट्विट मार्च महिन्यातील होते. ड्राफ्टमध्ये ते ट्विट होते परंतु मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते ट्विट चुकून पोस्ट झाले आहे असा खुलासा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. मागची पोस्ट आपोआप कशी फॉरवर्ड झाली ते मला सांगता येणार नाही. आम्ही सर्व जण उद्धव ठाकरेंना सतत सांगत होतो की तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून राहा, सत्ता ही इतरांच्या हातात द्या. ठरल्याप्रमाणे जर शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले असते आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहिले असते तर शिवसेना पक्ष आणखी वाढीस लागला असता असे शिरसाट यावेळी म्हणाले. दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिक आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी केल्याचंही शिरसाट यांनी सांगितले.
तसेच पुढे ते म्हणाले, मी कधीही कुठेही दबावतंत्राचा वापर केला नाही. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी देखील मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट यावेळी म्हणाले. पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार मला संधी मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले.