सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नवा फर्मान काढला. सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम बोलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर त्यांचे म्हणणे आहे की हॅलोसारखे शब्द परकीय आहेत. म्हणून, हे शब्द टाकून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात की वंदे मातरम् हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल आहे. मुनगंटीवारांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. सुधीर मुनगंटीवारांनंतर आता काँग्रेसच्या नव्या घोषणेची चर्चा आहे. मुनगंटीवारांच्या ‘वंदे मातरम’च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे.
काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना वंदे मातरम् आमचा स्वाभिमान पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरम् ला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळी राजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्री करण्यात आलं. सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना केल्या. फोन संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’नं करण्याचं अभियान राबवणार, असं जाहीर केलं. नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली आणि चर्चांना उधाण आलं आहे. सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याचा आदेशामुळे वाद रंगला. रझा अकादमीनं या आदेशाला विरोध दर्शवला आहे. तर राज्याच्या राजकारणातूनही अनेक मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.
दरम्यान, या वादावरून इतर नेते मंडळींनी देखील हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे. अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून, कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचं आहे. मला जय भीम म्हणायचं आहे. आता ते जबरदस्ती आमच्या कडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार. असे आव्हाड यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांनी या गोष्टीचे समर्थन केले आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरमच्या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी समर्थन देताना म्हटलं की, अमित शहा यांच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलल जातं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फोन केल्यावरही हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलतात आणि ते ऐकायला छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. पंकजा मुंडे यांनी या निर्णयाला समर्थन दिलं आहे. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.