जालन्यातील (Jalna) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडले आहेत. २ सप्टेंबर २०२३ पासून मराठा समाज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनाकरता बसली होती. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केला यात अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत. याबाबत नागपुरातील संस्थानिक आणि भोसले घराण्याचे विद्यमान वंशज मुधोजीराजे भोसले (Mudhojirao Bhosale) यांनी एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, अशी वेगळीच मागणी मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी गावात जो प्रकार घडला, तो दुर्दैवी होता. आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजूट होऊन काम करत आहे. अचानक मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीमार नींदनीय आहे, असं मुधोजीराजे म्हणाले.
मराठ्यांची आरक्षणाची मागणी प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी आहे. राजघराणे, उद्योजक यांना आरक्षण नकोय पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच, आम्ही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहोत. जर सरकारला ते द्यायचे नसेल तर सरकारने समान नागरी कायदा करावा आणि सर्वांना समान पातळीवर आणावं. एकदा समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी असे मुधोजीराजे भोसले म्हणाले.
शिक्षण आणि या दोन मुद्यांसाठी आम्ही लढतोय. आम्हाला जमीन द्या किंवा राजकारणात आरक्षण द्या अशी मागणी कोणताही मराठा बांधव करत नाही. मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी किती वर्ष संघर्ष करायचे. त्यामुळे एक तर शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्यावं, नाही तर समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुधोजीराजे भोसले यांची ही मागणी इतर मराठा संघटनांना मान्य होते की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.