दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ही झाली आहे. यंदा दिनांक ७ ते २० डिसेंबरपर्यंत हे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. नागपुरात (Nagpur) सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2023) आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्द्यावरुन अधिवेशाचे दोन दिवस सभागृहांमध्ये गदारोळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल. तर आज विधीमंडळावर काँग्रेस पक्षाचा हल्लबोल मोर्चा हा धडकणार आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज विधीमंडळावर अनेक मोर्चे देखील धडकणार आहेत. आजचा सर्वात प्रमुख मोर्चा हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी वरून निघणारा मोर्चा विधिमंडळापर्यंत जाऊन सभेत रूपांतरित होईल. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील. धनगरांच्या आरक्षणासाठी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे, विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
आज विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे ही वाचा:
जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन
कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना