पुण्यात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या धुमाकुळीत वाढ होत चालली आहे. या भटक्या कुत्र्यांनी अनेकवेळा नागरिकांवर हल्ले केले आहेत. त्यात पुन्हा एकदा एका भटक्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला आहे. यामध्ये ती गंभीर रित्या जखमी झाली आहे. ही घटना हांडेवाडी (Handewadi) येथील कुमार पेबल पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. कुत्र्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे श्वान पथक सोसायटीमध्ये दाखल झाले पण तिथे असलेल्या एका प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्यांना महापालिकेकडे देण्यास नकार दिला. पण याच कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भटक्या कुत्र्यांचा त्रास सोसायटीतील सर्वच नागरिकांना होत आहे. सोसायटीमध्ये राहत असलेली लहान मुले खेळण्यासाठी खाली येतात तसेच वयस्कर नागरिक सोसायटीच्या आवारात बसण्यासाठी येतात. या भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना खेळता येत नाही. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कोणाचाही बळी जाण्याआधी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्वानफिडर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या या दोन्हींवर तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिकेला केली आहे.
रस्त्यांवर फिरणारी भटकी कुत्री कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांवर देखील ही कुत्री हल्ला करतात. त्यामुळे अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुणे महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे ही कुत्री कमी होत असली तरी हल्ला करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांच्या हल्ल्यात जखमी होऊन निधन झाले होते. मागील वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी १६ हजार ५६९ जणांना चावले आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांची मोठी घोषणा, ठाकरेंची शिवसेना लोकसभेत २३ जागा लढणार
सरकारने २०२४ येण्याच्या आत आंतरवाली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे; मनोज जरांगे