महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. आरे येथील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न सुरू होते. पण शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा आरे येथील कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यानंतर हे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील या आरे कारशेडला (aarey carshed) विरोध करण्यासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता राष्ट्रवादीही सहभागी झाली असून आज आरे येथे राष्ट्रवादीकडून (NCP) सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. द बॉम्बे कॅथलिक सभेचंही सरकारविरोधात जोरदार आंदोलन चालू आहे.
शिंदे सरकार सत्तेत आल्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘आरे जंगल वाचवा मोहिम’ काढली होती. या आंदोलनावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनानंतरही काही पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन केले जाणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, मागच्या रविवारीसुद्धा काँग्रेसकडून (Congress) आरे वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा आरे येथील कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली होती. राजकीय पक्षांच्या विरोधानंतरही कारशेडचे काम चालूच असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारने आरे मेट्रो कारशेड पुनश्च आरे कॉलनीत बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध रविवार दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी, सकाळी ११ वाजता, गोरेगाव पूर्व, येथे आंदोलन छेडण्यात आले आहे. या मोर्च्याचे नेतृत्व मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव यांनी केले.
हे ही वाचा :-
तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला ; पंतप्रधानांकडून कौतुक
उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती