मराठी सिनेसृष्टीतील हुरहुन्नरी कलाकार अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी कलाविश्वाला त्यांच्या अभिनयाच्या जोरावर भरभरुन योगदान दिले आहे.दरम्यान आता त्यांनी ,सिनेसृष्टिला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलं आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.९०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा हा एक लोकप्रिय चेहरा आहे.तेव्हाच्या प्रेक्षक वर्गापासून ते आताच्या पिढीतील प्रेक्षक वर्गापर्यंत अशोक सराफ हे आवडते कलाकार आहेत.त्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाचे नवनवीन पैलू प्रेक्षकांसमोर मांडले,दरम्यान अशोक सराफ यांचा चित्रपट पाहायला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडतं
मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका तसंच नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. अशोक सराफ आणि विनोदी भूमिका हे समीकरणचं जणु काही त्यांच्यासाठी बनलं होत.त्यांच्या अभिनयाची शैली आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग याला तोडच नाही.त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले.अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. त्यांचं काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक ‘अशोक सम्राट’ म्हणू लागले.
इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अशोक सराफ बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना अक्षरश: वेड लावलं. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.अशोक सराफ यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे,हिंदीत ही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले.दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट देखील झाले,दरम्यान अशा अफलातून कलाकाराला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणं हा त्यांचा खुप मोठा सन्मान आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, हा छत्रपती शिवरायांचा आदेश- Dr. Amol Kolhe
अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग