छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीचं असते.वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका असतात.त्या प्रेक्षकांना पाहण्यासाठी अतिशय आवडतात.अशातच आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे.रंग माझा वेगळा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक चांगली पसंती दाखवत होते. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला रेश्मा सज्ज आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या घटना या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका होय.
सतीश राजवाडे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबद्दल बोलताना म्हणाले,”रसिकांच्या अवती भवती होणाऱ्या गोष्टी मालिकेत दिसल्या की त्या आपल्याशा वाटतात. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहित आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात. कुटुंब म्हण्टलं की माणसं आली, भांड्याला भांडं लागणारच. पण म्हणून कोणी आपल्या माणसांना अंतर देत नाही”. पुढे म्हणाले,”प्रत्येकाला सांभाळून आपण पुढे जातो. जो हिंमत ठेवतो, ज्याला माणसं जोडून ठेवता येतात तो जिंकतो. ही मालिका सुद्धा अशीच आहे नात्यांवर भाष्य करणारी. कोणत्याही परिस्थितीत दोष व्यक्तींचा नाही तर परिस्थितीचा असतो असं समजून घर टिकवणारी. तोडणं फार सोपं असतं, कठीण असतं ते जोडून ठेवणं”.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली,‘रंग माझा वेगळा’ मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती”. पुढे म्हणाली,”जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली”.
दरम्यान ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदे व्यतिरिक्त सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.दरम्यान आता प्रेक्षकांना या मालिकेचे उस्तुकत्ता आहे.
हे ही वाचा:
इतके धिंडवडे निघालेला आपला महाराष्ट्र कधी नव्हता – VIJAY WADETTIWAR
गोळीबार प्रकरणामुळे तणावाचे वातावरण, कल्याण बंदची हाक…