कोरोना महामारीच्या आजाराचे संकट थोड्या थोड्या प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव (Ganesh utsav) उत्साहाने पार पडत आहे. गणेश आगमनासोबत आता गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) गणेश विसर्जनाला (Ganesh Visarjan) मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port Trust) परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जन केले जाईल तेथील परिसराची व समुद्राची दररोज साफसफाई करावी, प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन करावे आणि त्याकरता पालिकेने नियमावली तयार करावी. विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, धातू किंवा लाकडाच्या वस्तू, मूर्तीचे अवशेष रोजच्या रोज साफ करावे. जेट्टीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जेट्टीचे नुकसान झाल्यास ते दुरुस्त करून द्यावे. विसर्जनाबाबत पालिकेने बोटींचे व्यवस्थापन करणाऱ्या लाँच ऑपेरेटर आणि बीपीटी प्राधिकरणाला आधी कल्पना द्यावी. या सर्व अटी घालण्यात आल्या आहेत.
मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीव रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
संरक्षण क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी भारत एक पाऊल पुढे
हैदराबादमध्ये ब्रह्मास्त्रचा प्री-रिलीज इव्हेंट रद्द, कलाकारांनी चाहत्यांची मागितली माफी