महाराष्ट्रात विठुरायाचे भक्त आपली भक्ती दाखवण्यासाठी आषाढी एकादशीला उपवास करतात. महाराष्ट्रातील प्रत्येकजण आषाढी एकादशीला दुपारी आणि रात्रीच्या जेवणात उपवासाचे पदार्थ खात असतो. उपवासाला बहुतेक सर्वजण साबुदाण्याची खिचडी करतात. मात्र उपवासादरम्यान कधी कधी झटपट आणि चविष्ट असे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण वरीच्या तांदूळाचा पुलाव करून पाहू शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनतही घ्यायची गरज नाही. ही रेसिपी खूप कमी वेळात सहज बनवता येते. आषाढी एकादशीनिमित्त खास उपवासाचा पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहुयात.
वरीचा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- वरीचा तांदूळ- १ कप
- भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट- १/२ कप
- उकडलेले बटाटे- १ बटाटा
- रताळ्याच्या फोडी- १/२ कप
- जिरे- १ टी स्पून
- हिरव्या मिरच्या- ४ ते ५
- काजू -बदामाचे तुकडे- १० ते १२
- साजूक तूप- २ टी स्पून
- पाणी गरजेनुसार
- मीठ चवीनुसार
- साखर चवीनुसार
वरीचा पुलाव कसा बनवायचा?
- सर्वप्रथम बटाटे धुवून ते उकडण्यासाठी ठेवा आणि वरीचे तांदूळ पाण्यात भिजवा. जवळपस १५ ते २० मिनिटानंतर वरीमधील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा आणि काही वेळ तसेच ठेवा.
- वरीचा भात तयार करण्यासाठी उर्वरित तयारी करा. उकडलेली बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून हिरव्या मिरच्या बारीक करून घ्या.
- गॅसवर एक कढई ठेवून त्यात तूप घालून गरम करा. सर्वप्रथम काजू बदामाचे तुकडे तळून घ्या आणि बाजूला एका ताटात ठेवा.
- उरलेल्या तूपात जिरे घालून फोडणी करून घ्या. नंतर त्यात बटाटे आणि रताळ्याचे तुकडे घालून थोडे मीठ टाका आणि २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
- चांगले परतून झाले की त्यात भिजवलेले वरीचे तांदूळ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि आणखी २ मिनिटे राहू द्या.
- आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला.
- नंतर त्यात दाण्याचा कूट आणि साखर घालून शिजवावे. सुमारे १५ ते २० मिनिटे हे व्यवस्थित शिजू द्या.
- वरीचे तांदूळ शिजत आले की गॅस बंद करा आणि वरून तळलेले काजू बदामाचे तुकडे टाका.
- गरमागरम वरीचा पुलाव खायला तयार आहे.
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.