लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्यानंतर विधानसभेसाठीदेखील ते एकत्र येणार आहेत. आणि यासाठीच आता जागावाटपावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यात जागावाटपावरून वाटाघाटी होणार आहेत. यासाठी एक समनव्य समिती नेमण्याचे काही दिवसांअगोदर सांगण्यात आले होते. आता काँग्रेसकडून याबाबत खुलासा करण्यात आला असून या समन्वयासाठी १० जणांची समिती नेमण्यात आली आहे. काँग्रेसकडून एक पत्र जाहीर करण्यात आले असून याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. २०१९ साली १ जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकांमध्ये १३ जागांवर यश मिळवण्यात यशस्वी झाला. आता हीच कामगिरी विधानसभेतदेखील करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसची १० सदस्यांची समिती गठीत केली आहे. यामध्ये मुंबईसाठी तीन नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. जागावाटपासाठी शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात वाटाघाटी होणार आहेत. या साठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या तसेच वरिष्ठ अश्या १० नेत्यांची समिती नेमली आहे. तसेच, मुंबईसाठी मुंबईमधील तीन प्रमुख नेत्यांचाही या समितीत समावेश केला गेला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गठीत केलेल्या समितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच मुंबईतील जागावाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांना समितीत स्थान देण्यात आले आहे. आता, काँग्रेसकडून समन्वय समितीसाठी १० जणांची समिती नेमली हे. परंतु अद्याप शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून समन्वय समितीत कोण सहभागी होणार हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे, त्यांच्याकडून कुठल्या नेत्यांना समितीत स्थान मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप