शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (शनिवार, २७ जुलै) ६५ वा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) असून मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु आता त्यांच्या एकेकाळच्या पक्षातील साथीदार आणि आता शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena) प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख ‘शिवसैनिकांसाठी काळा दिवस’ असा केला आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
शीतल म्हात्रे या आपल्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून आपल्या विरोधकांवर त्या कायम तोंडसुख घेत असतात. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी समाजमाध्यमांवर शिंदे गटाची बाजू लावून धरली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कायम टीकाटिपण्ण्या करणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर चक्क त्यांच्या वाढदिवशीच टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे महायुतीतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या असल्या तरी शीतल म्हात्रे यांनी ‘जनाची ना मनाची तरी लाज वाटते का ?’ असा सवाल विचारला आहे.
काय म्हणाल्या शीतल म्हात्रे?
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत शीतल म्हात्रे म्हणाल्या-
२७ जुलै २००५
शिवसैनिकांसाठी काळा दिवस!
नुसत्या ‘नावा’चा आणि ‘प्रॉपर्टी’चा वारसा सांगणारे मौजमजेसाठी अंथरुणात खिळलेल्या बापाला पुरात ‘एकटं’ सोडून पळून गेले, तो हाच दिवस!
हो, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते…
ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व, मराठी माणूस सांभाळला… पण त्यांच्याच पुत्राने ‘नीतिमत्ता’ सोडून, मातोश्रीवर बाळासाहेबांना ‘एकटं’ टाकून, कुटुंबीयांसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पलायन केले.
आणि तेच आता आपल्या चेल्यांसह, ‘माझा बाप चोरल्या’ची आवई उठवतात…
लाज वाटते का लाज … जनाची ना मनाची तरी…? #काळादिवस
शीतल म्हात्रे यांच्या ट्विटने आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आता यावर शिवसेना उबाठा गट काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वाँचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा खास किस्सा, जावई नेमका कसा शोधला?