विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्याप्रमाणात वादळवारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष हा या वादळात आपले वादळ मिसळू पाहत आहे. एकंदरीतच जनमानसाचा कौल हा प्रत्येक पक्षसंघटन स्वतःकडे घेऊ पाहत आहे. अशातच आज (१० ऑगस्ट )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या ठाण्यात धडकणार आहेत. आपल्या भाषणातून आक्रमक भूमिका मांडणारे व विरोधकांवर सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. या शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे संबोधन करणार आहेत. सध्या शिवसेनेच्या (उबाठा) वतीने भगवा सप्ताह सुरु आहे. यात सप्ताहाच्या अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे मेळावा घेतला होता. या सप्ताहतील तिसरा मेळावा ठाण्यात घेण्यात येणार आहे.
शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे हे त्यांच्याच शिवसेनेचे असल्याचे स्पष्ट केले होते. या निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून त्यांनी या पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत घेण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी करत निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगला होता. मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात. यामुळेच शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. यामुळे या मतदार संघातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून तो कुणाच्या ताब्यात राहणार हे ठरविणारी ही निवडणूक होती. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान ठाणे शहरासह जिल्ह्यात शिवसैनिक झंझावाती सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी नेते व माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे कुणावर टीकास्त्र सोडतात पाहावे लागणार आहे.
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.