कोल्हापूर येथील १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Natyagruha) (गुरुवार, ८ ऑगस्ट) अचानक आग लागली. शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक होताना पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
“कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करतानाच ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील,” अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल,’ असे ते म्हणाले. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेमुळे राज्यातील कलाप्रेमी दुःखी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती असून पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती सादर होत राहतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. अनेक कलाकार येथे घडले, त्यांच्या आठवणी वास्तूशी जोडलेल्या होत्या. त्यामुळेच ही वास्तू आगीत भस्मसात होणे, ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी आहे,” अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Eknath shinde यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार Uddhav Thackeray यांची मुलुखमैदानी तोफ..