गेल्या काही दिवसांपासून देशभरातुन आणि राज्यातून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत त्यांनी, “बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार,” अशी ग्वाही दिली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार…
या घटनेत दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रस्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलने सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते ‘अलर्ट मोड’वर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सुचना ही दिल्याहेत. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत
समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावे, अशी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे..
नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेतील चार वर्षे आणि सहा वर्षे वयाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली .
या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात चालढकल केल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अजूनही पालकांसोबत समोरासमोर कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत शाळा प्रशासन काही बोलायला तयार नसल्यामुळे पालक प्रचंड संतापले आहेत. पालक आणि बदलापूरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा: