विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित ‘ महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम या सारख्या महान संताची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या पावन भूमीत हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे देशाची जगात ओळख आहे. छत्रपतींच्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान असून प्रत्येकाच्या मनात त्यांची अमीट छाप आहे. महाराष्ट्र भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्याच्या विकास कार्यात मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेली रोजगार हमी योजनेची संकल्पना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या गेली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असलेल्या लाखो गरजूंना सहायक ठरणारा हा क्रांतिकारी असा निर्णय लोकशाही इतिहासातील एक अद्वितीय उदाहरण आहे. सामाजिक आणि राजकीय सौहार्दासाठी महाराष्ट्र ओळखला जातो. या शतक महोत्सवानिमित्त उत्कृष्ट संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन केल्याबद्दल अभिनंदन करुन राज्यपाल यांनी पुरस्कार विजेत्यां सदस्यांचे अभिनंदन केले.
अतिशय संघर्षमय वाटचाल करत आज देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन उपयुक्त निर्णय, महत्वाच्या योजना राबवत असून मोठ्या प्रमाणात त्याची अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. महिलांना आर्थिक सहाय्य करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाली असून महिलांचा मोठा प्रतिसाद याला मिळत आहे. या अंतर्गत आतापर्यंत दिड कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दीदी योजना, शासकीय कागदपत्रांवर आपल्या नावाच्या पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय तसेच लेक लाडकी योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोफत शिक्षणाची संधी, यासोबतच महिलांसाठीच्या अनेक उपयुक्त योजना राज्य शासन राबवत आहे. एका बाजूला विकास साधत असताना दुस-या बाजूला कल्याणकारी योजनांची जोड देत महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
हे ही वाचा:
‘येक नंबर’ बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा