मराठवाडा आणि विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्य नागरिकांनाही पावसामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच युवासेनाप्रमुख आणि शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ह्यांनी आज (बुधवार, ४ सप्टेंबर) मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत ‘आदित्य ठाकरे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही,’ अश्या शब्दांत निशाणा साधला होता. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत, “धनंजय मुंडे मी दोन-तीन वर्ष नाही तर त्याआधी सरकार असताना सुद्धा दौऱ्यावर यायचो, धनंजय मुंडे यांचं महाराष्ट्राशी एवढं नातं तुटेल मला माहिती नव्हतं,” असे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “काल परवा जी अतिवृष्टी झाली, पाणी दोन्ही बाजूने वाहत आहे. शेतात पूर्ण पाणी गेलं आहे, येथे काही जणांची स्थलांतरांची मागणी आहे. या संदर्भात चौकशी झाली पाहिजे विचारपूस झाली पाहिजे. स्थलांतर कुठे होऊ शकते, योग्य ती जागा मिळू शकते का,यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं,” असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “मंत्री मी आहे की ते, त्यांना वाटत असेल तीन वर्षातून एकदा, त्यांचा एवढा राजकारणाशी आणि महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल, हे मला माहिती नव्हतं. दोन-तीन वर्ष नाही, त्याआधी सरकार असताना सुद्धा यायचो, दुष्काळ असताना सुद्धा यायचो. यावर्षी किती वेळा आलो, त्यांच एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी मला माहिती नव्हतं, त्यांनी महाराष्ट्राशी थोडा संपर्क वाढवावा,” अश्या शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंवर आगपाखड केली.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही म्हणूनच आम्ही रात्रीपासून इथं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पडलोय. आदित्य ठाकरे यांनी चार्टर विमानाने यावं आणि फोटो शूट करावं आणि पूतना मावशीचा प्रेम दाखवावं, यासारखं दुर्दैव काहीच नाही. आदित्य ठाकरे म्हणतात या राज्याला कोण कृषिमंत्री माहित नाही. आदित्य ठाकरे आणि मी दोघांनी बैल जोडी तीफनी वरती बसावं आणि कोणती पण मारते बघावं. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, तीन वर्षानंतर आता बांधावर येत आहात. तेही निवडणूका समोर आहे म्हणून, अशा गलिच्छ राजकारणाला मला उत्तर द्यायचं नाही, ते राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलोय, कारण आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य