क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए (NCPA) येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे. यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगून मंत्री केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणनेव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री केसरकर म्हणाले, शासनाने सर्व विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात अंडी, केळी, मिलेटस् देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा तसेच शेतीची माहिती व्हावी यासाठी परसबाग योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा कमी करण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत असून जर्मनीमध्ये रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावाचन उत्सव अभियानाअंतर्गत एक लाख शाळा आणि एक कोटी विद्यार्थी सहभागी होतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बदलापूर येथील दुर्देवी घटनेनंतर तातडीने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षण मंत्री केसरकर यांच्या कार्यकाळातील निर्णयांचे संकलन असलेल्या कार्यअहवालाचे तसेच ‘बालभारती’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हे ही वाचा:
कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य