उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार, ६ सप्टेंबर) आपल्या ‘X’ अकाऊंटवरून मोठी बातमी देत संपूर्ण देशात महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पाहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अभिनंदन महाराष्ट्र म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!
गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.
दुसर्या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी),
तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी),
चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी),
पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी),
सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी),
सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी),
आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी),
नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी)
या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)
राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली.
दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे…
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge