आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच राज्यातील इतर पक्षाचे राज्यभरात दौरे, सभा आणि बैठकांचे सत्र चालू आहे. महायुतीमध्येही राज्यभर दौऱ्याचे कार्यक्रम पार पडत असून महायुती सरकारने सुरु केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेते राज्यभर हिंडत आहेत. अश्यातच, आज (मंगळवार, १० सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे धुळे दौऱ्यावर आले आहेत. धुळ्यात फडणवीसांची सभा पार पडणार आहे मात्र त्यापूर्वीच हि सभा उधळून लावण्याचा इशारा काँग्रेस (Congress) नेत्याने दिला आहे. त्यामुळे धुळ्यातील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी त्यांची सभा उधळण्याचा इशारा दिला होता. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्यामसनेर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, खरीप पिक विमा 2023 24 ची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावण्यात आला. मात्र श्याम सनेर हे त्यांच्या निवासस्थानी नसल्याने सभास्थळी पोलिस तैनात करण्यात आला होता. यावेळी शाम सनेर यांच्यासह शेतकरी बांधवांनी आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलीस प्रशासनाने ताबडतोब या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असताना हे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप शाम सनेर यांनी यावेळी केला.
पोलिस प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती
तसेच, फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला मराठा आंदोलकांचीदेखील धास्ती लागली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याअगोदरच मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या धुळे दौऱ्यावर मराठा आंदोलक गोंधळ निर्माण करू शकतात, या भीतीने पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वीच मराठा आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौऱ्यावर, त्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करणार आहेत. शहरातील विविध पोलिस स्टेशन मध्ये शेकडो मराठा आंदोलकाना पोलीसांनी सकाळीच ताब्यात घेतलें आहे. फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून हि कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा