काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर आता विरोधकांनी चांगलीच आगपाखड केली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत, “देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली असून, राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या भावना दुखावल्या आहेत.” असे वक्तव्य केले आहे.
अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत राहुल गांधी यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले, “देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील जेकेएनसीच्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो, किंवा परदेशी मंचांवर भारतविरोधी बोलणं असो, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या आहेत.”
“भाषेपासून भाषेला, प्रदेशापासून प्रदेशाला आणि धर्मापासून धर्मापर्यंत असा भेदभाव करणे हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते. देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला आहे. मनातील विचार आणि कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात.मला राहुल गांधींना सांगायचे आहे की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेशी कोणी खेळू शकत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा परदेशातील त्यांच्या वक्तव्याने समोर आला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोलले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचे आहे. संविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कॉंग्रेसने कधीही सन्मान केला नाही, केवळ मतासाठी कशाप्रकारे ते खोटा नरेटिव्ह सेट करतात हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut