मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Muktisangram Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (मंगळवार, १७ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मराठवाड्यात ४५ हजार कोटींपेक्षा जास्त निधीतून प्रकल्प सुरू असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांवर खरपूस टीका करत, “४६ हजार कोटींच्या केलेल्या घोषणांपैकी किमान ४६ रुपयांचे काम केलेले मुख्यमंत्र्यांनी दाखवावे,” असे आव्हान दिले आहे.
अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “४६ हजार कोटींच्या केलेल्या घोषणांपैकी किमान ४६ रुपयांचे काम केलेले मुख्यमंत्र्यांनी दाखवावे. मी आव्हान देऊन एक लाख रुपयांचे बक्षीस जाहिर करतो, त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांवर गत एका वर्षात कोणते कामे पूर्ण झाली त्याची सत्य माहिती मराठवाड्यातील जनतेसमोर मांडावी. आज मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी २९ हजार कोटींचे कामे पूर्णत्वाकडे असल्याचे सूतोवाच केले. मुख्यमंत्री स्वातंत्र्यसंग्रामाच्या या शुभप्रसंगी सर्रास खोटे बोलले असून मराठवाड्यात मागील एका वर्षात ४६ रुपयांचेही कामे झाले नाही,” असे अंबादास दानवे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले, “आधीच्या सरकारमध्ये मराठवाड्याच्या अनुशेषात कायम भर पडली होती. मात्र महायुतीच्या कार्यकाळात हा अनुशेष दूर करण्याचे विशेष प्रयत्न झाले. आम्ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेतली होती. आज ४५ हजार कोटींपेक्षा जास्त निधीतून प्रकल्प सुरू आहेत. ते फक्त कागदावर नव्हे तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.”
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मराठवाड्याला मुक्ती मिळवून देण्याचा लढयात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने अभुतपूर्व लढा दिला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी तीव्र संघर्ष केला, अनेकांनी हौतात्म पत्करले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांना याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
Follow Us