शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद आज (बुधवार, १८ सप्टेंबर) पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D. Y. Chandrachud) यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेल्या गणेशाच्या दर्शनावरून वाद निर्माण झाला असता आता संजय राऊत यांनी यावरून नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांनी संबंध प्रस्थापित झाले आहेत त्यातून आम्ही आता काय न्यायाची अपेक्षा करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
याचवेळी संजय रराऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान आणि कायद्याची काही माहिती नाही. म्हणूनच ते सरन्यायाधीशांकडे आरतीला जातात आणि त्याचा व्हिडिओ समोर आणतात. प्रधानमंत्री जनतेला मूर्ख समजतात. सरकारच्या विरोधात अनेक प्रकरण सरन्यायाधीशांकडे आहेत, कोर्टात सुरू आहेत. आता सरन्यायाधीशांनी हे खटले चालवण्यास मी समर्थ नाही असं सांगायला हवं. प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीशांच्या मधुर संबंधांची पुष्टी झाली आहे,” असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी होणाऱ्या विलंबाबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्हाला तारखांवर तारखा देऊन गुंतवलं गेल आहे. एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी अभय दिला आहे. त्यामुळे आज काय होतं याकडे आमचा अजिबात लक्ष नाही. आम्हाला न्याय मिळणार नाही. या सगळ्यावर सरन्यायाधीश निवृत्तीनंतर भाष्य करतील. अनेक सरन्यायाधीश निवृत्तीनंतर खुलेपणाने बोलत असतात. त्यामुळे कोर्टाने जरी न्याय दिला नाही तरी जनता आम्हाला न्याय देईल. याप्रकारे नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांनी संबंध प्रस्थापित झाले आहेत त्यातून आम्ही आता काय न्यायाची अपेक्षा करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात मी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीला गेलो म्हणून काही लोकांच्या पोटात दुखते लोकांच्या पोटात दुखणार नाही त्यापेक्षा जास्त वेदना होतील. तुम्ही कायदे नियम राज शिष्टाचार हे सगळं खतम केलं आहे. संविधान तुम्हाला अशा प्रकारे परवानगी देत नाही. सरन्यायाधीशांनी माझ्यासमोर सरकार विरोधातली खटले चालवण्यास मी असमर्थ आहे असं सांगावं,” अश्या शब्दात त्यांनी टीका केली.