विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी सर्व नेत्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ऍम्ब्युलन्स खऱेदीत घोटाळा केला आहे. हे सरकार कमीशनखोर, खोकेबाज, धोकेबाज सरकार असून या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जागा अदानीला विकली जात आहे. भाजपा युती सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. विरोधी पक्षेते राहुल गांधी यांना जिवघेण्या धमक्या देणाऱ्यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, जिद्दीने कामाला लागा व कोकणातून जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवा असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
Follow Us